ज्ञान माऊलीचा’ भक्ती सोहळा संपन्न शासनाच्या सांस्कृतिक पर्वाची सुरुवात ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नाही जीवन जगण्याची दृष्टी ; अमोल चंदनकर

‘ज्ञान माऊलीचा’ भक्ती सोहळा संपन्न
शासनाच्या सांस्कृतिक पर्वाची सुरुवात
ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नाही जीवन जगण्याची दृष्टी ; अमोल चंदनकर
संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला ७५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यभर विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने ज्ञानोबारायांचे विचार, साहित्य आणि महान जीवनकार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अकलूज येथे ‘ज्ञानमाऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे थाटात आयोजन करण्यात आले होते.
अकलूज येथे चंदनकर क्लासचे संचालक अॅड. अमोल चंदनकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत चंदनकर, ह.भ.प. सुरेश वेदपाठक महाराज, माजी पोलीस अधिकारी बबनराव साळुंखे, हर्षवर्धन नाचणे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.
यावेळी ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ संग्रामनगर (ता. माळशिरस) यांच्या वतीने ह.भ.प. सुरेश वेदपाठक महाराज, चित्रपट अभिनेते व संगीत शिक्षक यांनी कीर्तनाची सेवा सादर केली. त्यांच्या अभंगवाणीने आणि कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते लहान मुलांनी सादर केलेल्या संतांच्या वेशभूषा. लहान मुलांनी विविध संतांची वेशभूषा परिधान करून मंचावर आगमन होताच कार्यक्रमात रंगत आली. यामध्ये निरंजन रविंद्र बोके (निवृत्तीनाथ), विजेंदर राजाराम यादव (ज्ञानेश्वर महाराज), रोहन रविंद्र सपकळे (सोपानदेव), प्रियंका तेलंगण (मुक्ताबाई) यांनी संतांची भूमिका हुबेहूब साकारून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर भजनाचा व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांना हार्मोनियमची साथ प्रशांत महामुनी यांनी तर पकवाज वादनाची साथ मुरलीधर पंडित यांनी केली.
• ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नाही जीवण जगण्याची दृष्टी
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेले विचार हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून मानवता, समता, निसर्ग, ज्ञान आणि विवेकाचा व्यापक संदेश देणारे आहेत. त्यांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि ज्ञानोबारायांचे साहित्य, तत्त्वज्ञान व विचार अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, या उदात्त उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्ञानोबारायांच्या विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचावा आणि त्यांच्या ज्ञान, समता व मानवतेच्या संदेशातून एक सुसंस्कृत समाज घडावा व ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नाही जीवन जगण्याची दृष्टी आहे. हीच या ‘ज्ञानमाऊली’ कार्यक्रमामागील प्रेरणा आहे.
अँड.अमोल चंदनकर, संचालक, चंदनकर क्लासेस, अकलूज



