सोशल मीडिया वृत्ताचा दणका! अंत्यसंस्कारासाठी मोबाईलचा उजेड पडला महागात ; नगरपंचायतीने घेतली तातडीची दखल नागरिकांच्या तक्रारींनंतर नगरपंचायतीची तत्परता

सोशल मीडिया वृत्ताचा दणका!
अंत्यसंस्कारासाठी मोबाईलचा उजेड पडला महागात ; नगरपंचायतीने घेतली तातडीची दखल
नागरिकांच्या तक्रारींनंतर नगरपंचायतीची तत्परता
संचार वृत्त अपडेट
श्रीपूर येथील स्मशानभूमीत मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीने त्याची तातडीने दखल घेतली आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेड्या बाभळींच्या फांद्यांची छाटणी करण्यास नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून सुरुवात केली आहे.

Àयासोबतच श्रीपूर येथील स्मशानभूमीत नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता व साफसफाईचे कामही हाती घेण्यात आले आहे. सकाळी नगरपंचायतीचे वायरमन प्रत्यक्ष स्मशानभूमीत दाखल झाले आणि बंद असलेल्या विद्युत व्यवस्थेची पाहणी करून दुरुस्ती केली. त्यानंतर हायमास्ट दिवाही सुरू करण्यात आला.
दरम्यान, नगरपंचायतीच्या आरोग्य विभाग प्रमुखांनी फोनवरून माहिती देताना स्मशानभूमीत दर आठवड्याला नियमित स्वच्छता व साफसफाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
कालच श्रीपूर येथील स्मशानभूमीत प्रकाशाची व्यवस्था नसल्याने मृतांवर मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची नगरपंचायतीने दखल घेत अवघ्या एका दिवसात समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.नगरपंचायतीकडून स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि रस्त्यालगतच्या धोकादायक फांद्यांची छाटणी सुरू झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, समस्या निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाची यंत्रणा सक्रिय का होते? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच नगरपंचायतीला या समस्यांची दखल घ्यावी लागली, अशी प्रतिक्रिया श्रीपूरमधील नागरिकांनी व्यक्त केली.



