solapur

डॉ. राधिका शहा यांचे अल्पशा आजाराने निधन– अवयवदान करून त्या झाल्या अमर

डॉ. राधिका शहा यांचे अल्पशा आजाराने निधन– अवयवदान करून त्या झाल्या अमर

संचार वृत्त अपडेट 

इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका संदेश शहा ( वय ५५ ) यांचे दिनांक १२ जानेवारी रोजी रात्री ११.४८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, सासू, पती, दोन मुली व एक मुलगा, दीर, जाऊबाई, दोन पुतणे, एक पुतणी असा परिवार आहे. त्यांनी मरणोत्तर नेत्र, ह्दय, किडनी, लिव्हर दान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपाध्यक्ष मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, नगराध्यक्ष भरत शहा यांच्या सह त्यांनी सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी ही तीन गावे टँकर मुक्त करण्यासाठी इंदापूर रोटरी क्लबला सकाळ तनिष्का म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांच्या त्या पत्नी होत्या. सकाळ मधुरांगण, तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी केंद्र संचालिका म्हणून विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणा साठी योगदान दिले. केंद्र सरकारच्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांनी सहाशे शेतकऱ्यांना गट शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र संचालिका म्हणून योगदान दिले. इंदापूर येथे येणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना त्यांनी मोफत आरोग्य शिबिराव्दारे एक महिन्याची होमिओपॅथिक औषधे देऊन तेहतीस वर्ष वारकरी सेवा केली. त्यांनी दहा वेळा रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला. बाराशे मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीन ची चाचणी करून त्यांना आरोग्य मार्गदर्शन केले. त्यांनी आतापर्यंत आरोग्य धनसंपदा या विषयावर शेकडो व्याख्याने दिली. कोरोना महामारीत ज्या रुग्णांना हॉस्पीटल मध्ये बेड मिळाले नाही, अश्या २२० रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन औषधे देऊन त्यांनी बरे केले होते. इंदापूर येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर उभारणी मध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलला. होमिओपॅथीच्या प्रचारासाठी त्यांनी मोफत १०० हून जास्त शिबिरे घेतली. इंदापूर येथे पंधरा हून जास्त चर्चासत्र घेऊन होमिओपॅथीचा प्रचार केला. इंदापूर तालुक्यात नेहरू युवा केंद्राच्या गणेशवाडी येथील तूर खरेदी केंद्र, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, युवापिढी साठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी योगदान दिले. इंदापूर शहराच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, युवक युवती सक्षमीकरण, शेती, आरोग्य आदी क्षेत्रात डॉ. शहा यांनी लक्षवेधी योगदान दिल्याने त्यांच्या अकाली मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button