कृषी मंत्री भरणे यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागणी

कृषी मंत्री भरणे यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागणी
संचार वृत्त अपडेट
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानभरपाई बाबत चर्चा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे
महापूर व अतिवृष्टीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागामध्ये जमीनी खरडून गेल्या असून पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागामध्ये एका दिवसात जवळपास ३०० मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
विशेषता राज्यातील सर्वाधिक नांदेड , धाराशिव , हिंगोली , बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा , विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. वरील जिल्ह्यातील कापूस , सोयाबीन , उडीद , मका , मूग , फळबागा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याकडेला असणा-या जमीनीमधील पिके पंचनामे करण्यासही शिल्लक राहिलेली नाहीत.
मुळातच खते , बि -बियाणे , किटकनाशके , तणनाशके , औषधे यांच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने व मजूरी बरोबर महागाई प्रचंड वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यामध्येच केंद्र सरकारचे आयात निर्यात चे सातत्याने बदलते धोरण ,गडगडलेले बाजारभाव यामुळे दिवंसेदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.
राज्यातील पुरग्रस्त व अतिवृष्टी भागातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट नुकसानभरपाईची मदत जाहीर करावी अन्यथा कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला जाणार असून राज्यातील शेतकरी आत्महत्येचे संकट आणखी गडद होईल.
यावेळी सतिश भैय्या काकडे ,पृथ्वीराज जाचक, अमरसिंह कदम , राजेंद्र ढवाण पाटील , अजित बोरकर , धनंजय महामुलकर, नितीन यादव यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.