साखरेचा दर किमान ५०/-रु. करा जंतर मंतरवर धरणे आंदोलनाचा इशारा

साखरेचा दर किमान ५०/-रु. करा
जंतर मंतरवर धरणे आंदोलनाचा इशारा
अकलूज (प्रतिनिधी)
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि साखर कामगार अडचणीत आले असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट दिल्लीच्या तख्ताला धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र ऊस परिषद – पंढरपूर यांच्या वतीने “चलो दिल्ली! चलो दिल्ली!!”चा नारा देत नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर दि. २, ३, ४ व ५ ऑक्टोबर रोजी ४ दिवस भव्य धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगार बांधवांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेने केले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे (नवी दिल्ली) अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंती केली.
परिषदेच्या प्रमुख मागण्या –
1. साखरेचा दर किमान MSP ५० रुपये करा ही या आंदोलनाची मुख्य आणि ठळक मागणी आहे.
2. केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने व साखर कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
3. शेतकरी, सहकारी कारखाने आणि कामगारांचे अस्तित्व व भविष्य वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावेत.
“शेतकरी वाचला तर शेती वाचेल, शेती वाचली तर सहकार वाचेल, सहकार वाचला तर कामगार वाचेल!” हा संदेश देत परिषदेने शेतकरी एकजुटीचे आवाहन केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र ऊस परिषदेचे पदाधिकारी दीपक भोसले (९७६३४८४६३०), सुहास पाटील सर (९४२२४६३८५१), सचिन पाटील (९५२७५२५००१), अजित बोरकर (९११९५०९९९९) आणि भानुदास सालगुडे-पाटील (८८८८९४५६५७) करणार आहेत.
साखरेच्या दराबाबत केंद्र सरकार लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.



