solapur

पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला; वीर, उजनीमधून विसर्ग सुरू

पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला; वीर, उजनीमधून विसर्ग सुरू

संचार वृत्त अपडेट 

घाटमाथ्यासह भीमा, निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे उजनी व वीर धरणांतून पाणी सोडण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारपासून सुरू करण्यात आली आहे. वीरमधून दहा हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

मागील दोन दिवसांपासून घाटमाथा परिसरामध्ये चांगला पाऊस सुरू झाला आहे. तर सोमवारी भीमा व निरा खोऱ्यातील अनेक प्रकल्पांवर दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक वाढून ६ हजार क्युसेक इतकी झाली असून दुपारी बारा वाजल्यापासून वीजनिर्मितीसाठी भीमा नदीच्या पात्रात १६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर वीर धरणांमधून सायंकाळी सहापासून दहा हजार क्युसेकने पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून हे पाणी निरा नृसिंहपूर येथून भीमा नदीत मिसळते. यामुळे येत्या दोन दिवसांत भीमेची पाणी पातळी वाढणार आहे निरा खोऱ्यातील धरणे आता भरत आली असून सरासरी ९६ टक्के पाणीसाठा चार धरणांमध्ये झाला आहे. तर वीर प्रकल्प हा ९१ टक्के भरला आहे. मागील २४ तासांत निरा देवघर, गुंजवणी या प्रकल्पांवर चांगला पाऊस नोंदला गेला. देवघर व भाटघर या दोन धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने वीरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

कालव्याचे पाणी बंद

उजनी धरण सोमवारी सायंकाळी १०४.५७ टक्के इतके भरले असून धरणातील एकूण पाणीसाठा हा ११९.६८ टीएमसी तर उपयुक्त साठा ५६ टीएमसी इतका झाला आहे. धरणातून मुख्य कालव्यात सोडण्यात येणारे पाणी आता बंद करण्यात आले आहे. सीना-माढा योजना, दहिगाव व भीमा सीना जोडकालव्यात पाणी सोडणे अद्यापही सुरू आहे. वीजनिर्मितीसाठी दुपारपासून १६०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button