शेतीपंपांना आजपासून सहा तास वीजपुरवठा

शेतीपंपांना आजपासून सहा तास वीजपुरवठा
संचार वृत्त अपडेट
वीज महावितरण कंपनीने उद्या (मंगळवार) पासून संपूर्ण राज्यभरातील शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार शेतीपंपांसाठी १५ जूनपर्यंत केवळ सहा तास वीजपुरवठा केला जाणार आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महावितरणने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरी आणि औद्योगिक भागातून सध्या विजेची मोठी मागणी वाढलेली आहे.ज्यादा दराने वीज खरेदी करून घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, शेतीपंपांना मोफत वीजपुरवठ्याची योजना चालू आहे. ज्यादा दराने वीज खरेदी करून मोफत वीज देण्याच्या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे सायंकाळी विजेची जादा मागणी असण्याच्या कालावधीत म्हणजे शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय महावितरण घेतला आहे.नव्या वेळापत्रकानुसार संपूर्ण राज्यभरात शेतीपंपांना वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार सोलापूर विभागातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तालुक्यात सकाळी ६.३५ ते दुपारी १२.३५ आणि १२.३५ ते सायंकाळी ६.३५ यावेळेत बीजपुरवठा राहणार आहे.
तसेच अकलूज विभागातही याच वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बार्शी विभागात पहाटे ४.१० ते सकाळी १०.१० आणि सकाळी १०.१० ते दुपारी ४.१० पर्यंत वीजपुरवठा चालू राहणार आहे.पंढरपूर विभागात पहाटे ४.४५ ते १०.४५ तसेच १०.४५ ते सायंकाळी ४.४५ या वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या भागाला वीजपुरवठा केला जाणार असल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.



